विद्रोह हा शब्द फॅशन म्हणून वापरला
जातो. राजकीय विद्रोहाची भाषा बोलताना गाडी इतकी घसरते की सुखदां, वरदां
मातृभूमीच्या विरोधात गरळ ओकलं जातं. राजकीय विरोध करता करता सत्य सनातन धर्माच्या
नरडीला नख लावण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या मुखातून अमृताचं सिंचन करायचं, त्या
मुखातून विषाचे फवारे बाहेर पडतात. ज्या चित्ताने मंगलाचं चिंतन करायच, ते
अमंगलाचं आराधन करायला लागतं. जे पेरता तेच उगवतं. चित्तातलं अमंगळ तुमच्या वर्तनात
यायला लागतं. काही तर दिवसरात्र व्हाटस्अपवर दुसर्या धर्मांच्या नावानं बोटं मोडीत
असतात. दुसर्यांना नावं ठेवण्याऐवजी तुमच्याकडे काय उत्तम, श्रेष्ठ आहे ते कधीच
सांगत नाहीत. अभ्यासच नाही तर काय सांगतील ? परिणामी त्यांना कुत्रंही विचारत नाही. नकारात्मकतेची
पेरणी करणारा कायम एकटाच पडत असतो, हा सनातन नियम आहे.
गंगेचा अमृतप्रवाह तीरावरच्या झुडपासंकट महावृक्षांचंही पोषण करतो. औषधी
वनस्पती असो, की विषवृक्ष प्रत्येकाची तृष्णा ते गंगाजल हरण करतं. तीरावर गाय येवो, की हिंस्त्र पशू प्रत्येकाची
तहान कोणताही भेदभाव न करता गंगा भागवते. ज्या ज्या ठिकाणी त्या शीतल जलाचा स्पर्श
होतो, तिथला ताप नाहीसा होतो. पाप फिटून जातं. अपवित्रांना पवित्र करीतच हा
पुण्यप्रवाह सागराला जाऊन मिळतो. सूर्य विश्व प्रदक्षिणेला निघाला म्हणजे
प्रत्येकाच्या डोळ्यांवरचा अंधकार दूर करतो. सर्वांना कल्याणाचा दरवाजा दाखवतो.
दिवसरात्र आपल्या स्वार्थाचा विचार न करता इतरांच्या हिताचा विचार करावा. जे
संकटात अडकलेले असतील त्यांच्या बंधविमोचनाचा विचार करावा. कोणाचंतरी अहित करून
आपलं हित करावं असा विचार चुकूनही मनात न येणं, याला अद्रोहत्व म्हणतात. माऊली
म्हणतात, वांचूनि आपुलिया काजालागीं । प्राणिजाताच्या अहितभागीं । संकल्पाचीही
आडवंगी । न करणें जें ॥
रमेश वाघ, नासिक
संपरक - ९९२१८१६१८३
0 टिप्पण्या