राष्ट्र प्रथम

      वृद्धअवस्थेतही सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉटने केलेल्या लाठीहल्ल्यात  जखमी झाल्यानंतर लाला लजपतराय म्हणाले, "आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील." आज त्यांचा स्मृतिदिन. त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत्। राष्ट्र हितासाठी व्यक्ती, कुटुंब, गाव अशा संकुचित स्वार्थाचा त्याग करावा. हसत हसत आपल्या प्राणाची समिधा स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात अर्पण करणारे अनेक नररत्न या भारतमातेच्या कुशीत जन्माला आले.

rashtra-pratham
rashtra-pratham

        रामाचं सीतेवर किती प्रेम होतं, याचं शब्दांत वर्णन करता येणार नाही. ते  मूळ वाल्मिकी रामायणात संस्कृतातूनच वाचावं. दुष्ट रावणाने सीतेचं अपहरण केल्यानंतर रामाने केलेला विलाप दगडाच्याही काळजाला पाझर फोडतो. चक्रवर्ती सम्राट असूनही आपल्या प्रिय पत्नीसाठी नाशिक ते श्रीलंका अनवाणी पायाने चालत जातो. रावणासारख्या महाबलढ्य शत्रुसोबत वनवासी वानरांना घेऊन लढतो. तोच राम राष्ट्राचा विचार आला, की आपल्या प्रियतमेचा त्याग करतो. स्वतःचा मामा जरी व्यापक समाजहिताला बाधा आणीत असेल, तर त्याला सिंहासनावरून  खेचूनच मारला पाहिजे. हा विचार कृतीत आणणारा श्रीकृष्ण आमचा मार्गदर्शक आहे. वास्तविक भीष्म, द्रोण  धार्मिक आणि तपस्वी होते; पण अन्यायाच्या बाजूने उभे  असतील, तर त्यांना  मारणे कर्तव्यच आहे, असा विचार मांडणारी श्रीमद्भगवद्गीता आज जगाच्या तत्त्वज्ञानाचा मुगुटमणी आहे.

          स्वराज्यकार्यासाठी आठ दिवसांवर आलेलं आपल्या लेकराचं लग्न टाळून रणचंडिला आपल्या उष्ण रक्ताचा अभिषेक करणारा तानाजी आमचा आदर्श आहे. जिच्यासोबत भावजीवनाचा डाव मांडला अशी प्राणसखी आयुष्याच्या पटावरून अर्ध्यातून उठून गेली, तरी आमच्या राजाने ते दुःख काळजात गिळलं आणि अफजलखानासारख्या नरराक्षसाशी जीव जोखमीत घालून लढायला गेले.  पोटच्या मुलाच्या चीतेच्या उजेडात लोकमान्य टिळकांनी दुसऱ्या दिवशीचा केसरीचा अग्रलेख लिहिला. रस्त्यांवर थुंकताना, वाहतुकीचे नियम मोडताना, समाजात द्वेष पसरवणारे व्हॉट्सॲप फॉरवर्ड करताना आम्हाला आमचे हे राष्ट्रपुरुष आठवले पाहिजेत. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, जय शिवराय अशा घोषणा देताना यांचा राष्ट्रविचार डोक्यात ठेवला, तर खरा राष्ट्राचा जय होईल. तोच त्यांच्या स्वप्नांचाही जय असेल. त्यासाठी डिजे लावून कंठशोष करण्याची आवश्यकता नाही. आपल्या वर्तनात अंतर्बाह्य देशाचाच विचार असावा. राष्ट्र हाच जीवनविषय. माऊली म्हणतात, तरी बाह्य आणि अंतरा। आपुलिया सर्व व्यापारा । मज व्यापकाते वीरा। विषयो करी॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३
rashtra-pratham
rashtra-pratham


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या