आपणचा आपला करूया सन्मान

 

        का वाचकाशी बोलत होतो. जशी चर्चा वैयक्तिक ख्याली-खुशालीपर्यंत आली. तसा त्यांचा आवाज बदलला. 'शंभर एकर जमीन आहे. चाळीस गाई आहेत. दोन मुले आहेत. गडगंज संपत्ती आहे. पण नोकरी नसल्याने मुलांची लग्ने जमत नाहीत.'  बोलता-बोलता त्यांच्या आवाजातली वेदना काळजाला घर करून गेली. इंग्रजांच्या गुलामीने म्हणा वा अजून कुठल्या कारणाने आम्हाला नोकरीच श्रेष्ठ वाटतेय. एखाद्या उद्योगपतीऐवजी लोक त्याच्या ड्रायव्हरला पसंत करतील. ही मानसिकता आहे. शेतकर्याकडे आता पूर्वीसारखी मुबलक जमीन राहिली नाही, हे खरेच आहे. पण ज्यांच्याकडे आहे,  त्यांनाही लग्नाच्या बाजारात किंमत नाही. गायींचं शेण काढावं लागेल, म्हणून रोज शेण काढणारी आईच गायीवाल्याचं स्थळ नाकारतेय.
bali-rajachi-upeksha-karu-naka
bali-rajachi-upeksha-karu-naka

                शेतकर्यांची लेकरं लग्न जमवण्यापुरतं पुणं, मुंबई गाठतात. जीव मुठीत धरून स्वभावाविरूध्द नोकरी करतात. लग्न झालं की, तुटपुंज्या पगारात घर चालणार नसतंच. पुन्हा गावाची वाट धरावीच लागते. ज्यांच्या सात पिढ्यात कोणी नोकरी केलेली नसते, तीच मुलीच्या माहेरकडची मंडळी फसवलंय म्हणून गळे काढतात. संसार मोडण्याची भाषा करतात. स्वत:च्या शेतकरी असल्याचा अभिमान बाळगतात आणि समोरच्या व्याही-जावई असलेल्या शेतकर्याला मात्र कचरा समजतात. अशा वागण्यानं कोणाचंच भलं होणार नाही. आपणच आपला सन्मान करणार नसू, तर जगात आपल्याला मानाची वागणूक मिळेल, याची अपेक्षा करणं कितपत योग्य आहे? आपल्या लेकराला आपण नावे ठेवली, तर जग नावे ठेवणारच.
                भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचं योगदान तीन-चार टक्केच असलं, तरी त्यावरच अख्खा डोलारा उभा असतो. एक वर्ष पाऊस नसू द्या, विकासदर घसरतोय. विश्वाच्या जगण्याचा पाया शेतकरी आहे. बाजारात भले त्याच्या शेतमालाला भाव नसेल, पण तुमच्या-आमच्या मनात त्याच्याविषयी भाव असायला हवा. खिशात चार पैसे आले की, नोकरदार स्वत:ला राजे समजतात. चारचाकीतून येवून कोथिंबीरीच्या जुडीचा भाव करतात. मोबाईल घेताना मात्र वाटेल ती किंमत मोजतात. शेतकरी नसेल, तर ना तुम्हाला तुमचे पैसे खाता  येतील,  ना मोबाईल!
दोन पिढ्या मागे गेलात, तर प्रत्येकाला आपली मूळं काळ्या  वावरात सापडतील. त्या मुळांचा गौरव बाळगला, तर आपोआप शेतकर्याचा गौरव होईल. हा विचार करावा आणि आपणच आपला आत्मघात थांबवावा. म्हणऊनि आपणयां आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु । येर स्वंयबुध्दी म्हणे बापु । जो नाथिलें नेघे ॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३
respect-yourself
respect-yourself


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या