खोट्या आशेचं बंधन

             पाश म्हणजे बंधन. बंधन आलं की, स्वातंत्र्य गेलंच. काही बंधनं खूपच गोड वाटतात. खायला मिळालं की, पोपटाला पिंजराच राजवाडा वाटायला लागतो. आपल्याकडे लोकांना हजारो वर्षांच्या गुलामीचं काहीच वाटत नाही. रेशीमबंध वगैरे शब्द फार गोड वाटतात, पण पिंजरा सोन्याचा असला, तरी तो पिंजराच! नाथ महाराज भावार्थ रामायणात म्हणतात, भ्रांतीमाजी सप्त पाश । अहंदारपुत्रपाश । गृहधनस्वजनपाश । आशापाश सातवा ॥ व्यक्तीच्या भ्रांत समजुतीमुळे सात प्रकारच्या बंधनात व्यक्ती अडकते. स्वत:चा अहंकार, पत्नीप्रेम, अपत्यप्रेम, घराची ओढ, स्वजनांची आवड ही सगळी तुमच्या विकासाला खीळ घालणारी बंधनेच आहेत. त्यातलं सर्वांत वाईट बंधन म्हणजे आशारुपी बंधन.
bond-of-fase-hope, खोट्या आशेचं बंधन

        आशेला अंत नसतो. तिच्यात व्यक्ती अडकली की शिकार्याच्या जाळ्यात अडकलेल्या हरिणीप्रमाणे व्यक्तीची अवस्था होते. जितकी हालचाल कराल तितके अधिक गुंताल. श्रीमद्भगवद्गीता सांगते, आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः। ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान्‌॥ शेकडो आशांनी बांधले गेलेले मनुष्य काम-क्रोधात बुडून विषयभोगांसाठी अन्यायाने द्रव्य संग्रह करण्याचा प्रयत्‍न करतात. कामनेच्या गाळात फसल्याशिवाय आशेची वाट दिसतच नाही. कामनेपोटी आशा जन्म घेते. कामना पूर्ण होण्यात अडथळा आला की, क्रोध जन्म घेतो. क्रोध निर्माण झाला की, मनाचं संतुलन ढळत. मोह उत्पन्न होतो. मोहाने योग्य-अयोग्य विवेक राहत नाही. कोणत्याही मार्गाने आपली इच्छा पूर्ण करावी, इतकेच ध्येय व्यक्तीच्या डोक्यात असते. बुद्धी काम करीत नाही. बुद्धी पांगळी झाली की, प्राणनाश ठरलेलाच.
        आशा कसली करावी, याचाही विवेक असायला हवा. कोय लावली, तर आंबा उगवणारच. एक दिवस मधुर फळही देणार. पण जर लागवडच केली नाही आणि फळाची आस धरली, तर ती कधीतरी पूर्ण होणे शक्य आहे का? आपण अपेक्षा भरपूर करतो, पण त्याला आधार काय, याचा कधीही विचार करीत नाही. ज्याला कवडीचे काम करण्याची अक्कल नाही, त्याने झोपल्या-झोपल्या करोडपती होण्याचं स्वप्न पाहणं, म्हणजे मूर्खपणाच नव्हे काय? उद्योगविहिन आशा कधीच फलित होत नसते. उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः। न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः।। जंगलाचा राजा जरी असला, तरी झोपलेल्या सिंहाच्या मुखात शिकार येऊन पडत नसते.
         व्यवहारशून्य आशा खंडितच होत असते. मनोरथांची उतरंड ढासळते. मनोभंग झालेली व्यक्ती विधी-निषेध शून्य वागायला लागते. कल्पनेचे इमले कोसळले की, सुख मिळत नाहीच, उलट अनंत संकटे निर्माण होतात. मासा आशेपोटीच आमिषाला बळी पडतो. व्यक्तीही फायद्यासाठी अनुचित मार्गाचा अवलंब करतो. पारधी जसा वेगवेगळ्या प्राण्यांच्या शिकारीसाठी वेगवेगळी साधने वापरतो, त्याप्रमाणे लोकही नको त्या खटपटी करतात. आशा शमत नाहीच. पण दुसर्याला त्रास देऊन मिळालेलं वित्त सुखही देत नाही. माऊली म्हणतात, परप्राणघातें । मेळविती वित्तें ।मिळाल्या चित्तें । तोषणें कैसें ॥
 रमेश वाघ नाशिक
संपर्क ९९२१८१६१८३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या