all-is-well |
आयुष्य म्हणजे सुख आणि दुःखाच्या काळ्या पांढऱ्या धाग्यांनी विणलेले वस्त्र आहे. वस्त्रामध्ये कोणताही रंग अनावश्यक किंवा वाईट नसतो. प्रत्येक रंगाची आपली ठराविक जागा असते. कापडातून तेवढ्याच रंगाचा तुकडा कापून काढायचा म्हटलं, तर सगळंच कापड निकामी होतं. जीवनाचंही तसंच आहे. वाईट आणि दुःखद वाटणाऱ्या गोष्टी वजा करायच्या म्हटलं, तर आयुष्याची चवच निघून जाईल. एखाद्याला नुसते गुलाबजाम खायला दिले, तर काही काळाने तो चटणीभाकर मागेल. ज्याला फक्त चटणीच मिळते, तो पक्वांनांची आशा करतो. वास्तविक सुखाची किंमत दुःखामुळेच आहे. दुःख नसेल तर सुखही टोचतं. दिवाळी आपणा सर्वांसाठी आनंदाचा सण असतो. राजाला मात्र तो आनंद कळत नाही. दिवाळीचे लाडू त्याच्याघरी रोजच असतात, त्यामुळेच राजाला दिवाळी माहीत नसते, अशी म्हण तयार झाली.
अभावात्मक परिस्थितीत एखादी गोष्ट हवीहवीशी वाटते. मिळाल्यावर मात्र हळूहळू तिचा विट येऊ लागतो. जीवापाड प्रेम करणारे दोन जीव एकत्र आले, तरीही वाद होतातच. अभावातच भाव निर्माण होतो. गरिबीत एक तीळ सात जण वाटून खातील. श्रीमंती आली की, कोणी कोणाची विचारपूस करीत नाही. चांगलं किंवा वाईट काहीही नसतं. शुभ अशुभाचा त्याग करून ज्याला जीवनाचा आनंद घेता येतो, तोच मस्त जीवन जगतो. रात्र असो की दिवस सूर्याला फरक पडत नसतो. तसं जीवनात सुखं आणि दुःखं सहज पचवता यायला हवीत. माऊली म्हणतात, वोखटें कां गोमटें । हें काहींचि तया नुमटे । रात्रिदिवस न घटे । सूर्यासि जेवीं ॥
रमेश वाघ, नाशिक.
संपर्क - ९९२१८१६१८३
सगळं चांगलंच असतं |
3 टिप्पण्या
व्वा माऊली... खूपच अप्रतिम लिहलंय!
उत्तर द्याहटवाहे अगदी खार आहे. सुखाची किंमत दुःख भोगल्या शिवाय काळात नाही..
उत्तर द्याहटवाहे अगदी खरं आहे. सुखाची किंमत दुःख भोगल्या शिवाय काळत नाही... प्रथम दुःखाचा अनुभव आला की तो नकोसा होती आणि त्यातून सुख प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते.
उत्तर द्याहटवाभविष्यात ही असेच लेख लिहत रहा... धन्यवाद